TRENDING NOW

अँटिगा – विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने वेस्ट इंडिज संघाला त्यांच्याच घरात पराभूत केले आहे. टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा एक डाव आणि ९२ धावांनी धुव्वा उडवून चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करताना भारताने ५६६ धावांचा डोंगर उभारला होता. या धावसंख्येचा पाठलाग करताना, वेस्ट इंडिजचा संघ पहिल्या डावात २४३ धावांमध्ये गारद झाला. त्यामुळे फॉलो ऑन घेऊन पुन्हा मैदानात उतरलेल्या विंडिजचा दुसरा डावही २३१ धावांवर आटोपला.
टीम इंडियाने अँटिगा कसोटी जिंकून वेस्ट इंडिज दौऱ्यात विजयी सलामी दिली. ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनटीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. अश्विनच्या फिरकी माऱ्यासमोर विंडीज फलंदाजांनी दुसऱ्या डावात अक्षरश: नांगी टाकली. ८३ धावांच्या मोबदल्यात अश्विनने सात विकेट्स काढण्याचा पराक्रम गाजवला.
चौथ्या दिवसाच्या उपाहारापर्यंत वेस्ट इंडिजने दोन बाद ७६ धावांची मजल मारली होती. पण उपाहारानंतर अश्विनने प्रभावी मारा करुन वेस्ट इंडिजचे कंबरडे मोडल्यामुळे विंडीजची आठ बाद १३२ अशी केविलवाणी अवस्था झाली होती. मग कार्लोस ब्रॅथवेट आणि देवेंद्र बिशूने नवव्या विकेटसाठी ९५ धावांची भागीदारी रचून विंडीजचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण अश्विनने बिशूला माघारी धाडून ही जोडगोळी फोडली आणि विंडीजचा दुसरा डाव २३१ धावांवर आटोपला.
नवी दिल्ली- दिल्लीत खासदार आणि बॉलीवूड अभिनेत्यांत स्वच्छ भारत बेटी बचाव अभियानंतर्गत प्रदर्शनीय फुटबॉल सामना झाला. यात योगगुरू बाबा रामदेव यांनीही सहभाग घेतला. दिल्लीतील जवाहर लाल नेहरु स्टेडियमवर हा सामना रंगला. बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर, डीनो मोरियासह अनेक सिलेब्रिटी मैदानावर दिसले. या सामन्याचे ब्रँड अॅम्बेसडर रामदेव बाबा होते. रामदेव बाबांनी मैदानावर बॉलीवुड स्टार्सच्या नाकी नऊ आणले होते. खासदारांच्या संघाचे कर्णधार बाबुल सुप्रियो होते. मनोज तिवारी हे देखील मैदानावर दिसले.
नवी दिल्ली : सरकारने केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या स्वीय सहाय्यकपदी देवयानी खोब्रागडे यांना नियुक्त करण्याची मागणी फेटाळली आहे. खोब्रागडेंचे नाव केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत यांनीच नाकारल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रिपाईंचे सरचिटणीस आणि माजी आयएएस अधिकारी उत्तम खोब्रागडेंच्या देवयानी खोब्रागडे या कन्या आहेत. १९९९ मध्ये त्या भारतीय परराष्ट्र खात्यात रुजू झाल्या. त्यानंतर अमेरिकेत उपकाऊन्सिल जनरलपदावर काम करताना खोब्रागडेंनी मोलकरणीच्या व्हिसासाठी खोटी कागदपत्र दिल्याचा आरोप ठेवण्यात आला. त्यांना अमेरिकेत अटकही करण्यात आली. या घटनेनंतर भारत आणि अमेरिकेच्या संबंधामध्ये काही काळ तणावाचे वातावरण होते.

Home Top Widget