2016
अँटिगा – विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने वेस्ट इंडिज संघाला त्यांच्याच घरात पराभूत केले आहे. टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा एक डाव आणि ९२ धावांनी धुव्वा उडवून चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करताना भारताने ५६६ धावांचा डोंगर उभारला होता. या धावसंख्येचा पाठलाग करताना, वेस्ट इंडिजचा संघ पहिल्या डावात २४३ धावांमध्ये गारद झाला. त्यामुळे फॉलो ऑन घेऊन पुन्हा मैदानात उतरलेल्या विंडिजचा दुसरा डावही २३१ धावांवर आटोपला.
टीम इंडियाने अँटिगा कसोटी जिंकून वेस्ट इंडिज दौऱ्यात विजयी सलामी दिली. ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनटीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. अश्विनच्या फिरकी माऱ्यासमोर विंडीज फलंदाजांनी दुसऱ्या डावात अक्षरश: नांगी टाकली. ८३ धावांच्या मोबदल्यात अश्विनने सात विकेट्स काढण्याचा पराक्रम गाजवला.
चौथ्या दिवसाच्या उपाहारापर्यंत वेस्ट इंडिजने दोन बाद ७६ धावांची मजल मारली होती. पण उपाहारानंतर अश्विनने प्रभावी मारा करुन वेस्ट इंडिजचे कंबरडे मोडल्यामुळे विंडीजची आठ बाद १३२ अशी केविलवाणी अवस्था झाली होती. मग कार्लोस ब्रॅथवेट आणि देवेंद्र बिशूने नवव्या विकेटसाठी ९५ धावांची भागीदारी रचून विंडीजचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण अश्विनने बिशूला माघारी धाडून ही जोडगोळी फोडली आणि विंडीजचा दुसरा डाव २३१ धावांवर आटोपला.
नवी दिल्ली- दिल्लीत खासदार आणि बॉलीवूड अभिनेत्यांत स्वच्छ भारत बेटी बचाव अभियानंतर्गत प्रदर्शनीय फुटबॉल सामना झाला. यात योगगुरू बाबा रामदेव यांनीही सहभाग घेतला. दिल्लीतील जवाहर लाल नेहरु स्टेडियमवर हा सामना रंगला. बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर, डीनो मोरियासह अनेक सिलेब्रिटी मैदानावर दिसले. या सामन्याचे ब्रँड अॅम्बेसडर रामदेव बाबा होते. रामदेव बाबांनी मैदानावर बॉलीवुड स्टार्सच्या नाकी नऊ आणले होते. खासदारांच्या संघाचे कर्णधार बाबुल सुप्रियो होते. मनोज तिवारी हे देखील मैदानावर दिसले.
नवी दिल्ली : सरकारने केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या स्वीय सहाय्यकपदी देवयानी खोब्रागडे यांना नियुक्त करण्याची मागणी फेटाळली आहे. खोब्रागडेंचे नाव केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत यांनीच नाकारल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रिपाईंचे सरचिटणीस आणि माजी आयएएस अधिकारी उत्तम खोब्रागडेंच्या देवयानी खोब्रागडे या कन्या आहेत. १९९९ मध्ये त्या भारतीय परराष्ट्र खात्यात रुजू झाल्या. त्यानंतर अमेरिकेत उपकाऊन्सिल जनरलपदावर काम करताना खोब्रागडेंनी मोलकरणीच्या व्हिसासाठी खोटी कागदपत्र दिल्याचा आरोप ठेवण्यात आला. त्यांना अमेरिकेत अटकही करण्यात आली. या घटनेनंतर भारत आणि अमेरिकेच्या संबंधामध्ये काही काळ तणावाचे वातावरण होते.
मुंबई : एकनाथ खडसेंच्या भोसरी येथील एमआयडीसीच्या जमीनखरेदीप्रकरण हेमंत गावंडे यांनी उजेडात आणले होते. राज्य सरकारने खडसेंवरील या आरोपांची चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती नेमली होती, आता या समितीविरोधात हेमंत गावंडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
आपल्या याचिकेत गावंडे यांनी म्हटले आहे, सरकारने उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती दिनकर झोटिंग यांची या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नियुक्ती केली होती. पण कायद्यातील तरतुदींचे या समितीला पाठबळ नसल्यामुळे ही समिती रद्द करण्यात यावी आणि या प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभाग आणि सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी व्हावी, तसेच चौकशी आयोग कायद्यातील तरतुदींनुसार चौकशी व्हावी.
याप्रकरणी खडसे यांनी मंत्रिपदाचा दुरुपयोग केला आहे का आणि त्यांनी कुटुंबीयांच्या नावे जमीनखरेदी करणे उचित आहे का, या मुद्दय़ांवर न्या. झोटिंग हे खडसे यांची चौकशी करणार आहेत. शासनाला अहवाल सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. न्या. झोटिंग हे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये १९९९ ते २००६ या कालावधीत न्यायमूर्ती होते. तसेच एकनाथ खडसे यांनी आपली पत्नी मंदाकिनी आणि जावई गिरीश चौधरी यांच्या नावे एमआयडीसीची ३ एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला. ही ३ एकर जमीन खडसे यांनी आपल्या मंत्रीपदाचा दुरूपयोग करून बाजारभावापेक्षा कमी किमतीत खरेदी केली, असा आक्षेप घेण्यात आला आहे. तसेच सर्व आरोपांच्या पार्श्वभूमीवर खडसे यांना आपले मंत्रीपद देखील सोडावे लागले.
नवी दिल्ली : आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोपिंगमध्ये अपयशी ठरलेल्या कुस्तीपटू नरसिंग यादव प्रकरणात लक्ष घातले आहे.
उत्तेजक द्रव्य सेवन केल्याप्रकरणी भारताचा कुस्तीपट्टू नरसिंग यादव दोषी आढळल्यावर आता त्याची रिओ वारी धोक्यात आली आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः याप्रकरणी लक्ष घातल्याने नरसिंगला अजूनही ऑलिम्पिकमध्ये जाण्याच्या आशा कायम आहेत. पंतप्रधानांनी स्वतः पक्षाच्या बैठकीत याविषयी चर्चा केल्याचे आज कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष बृजभूषण यांनी सांगितले. आता पंतप्रधानांनी स्वतः लक्ष घातल्याने याची लवकरात लवकर चौकशी होऊन उद्या होणाऱ्या वाडा समोरच्या सुनावणीत नरसिंगच्या ष़डयंत्राच्या दाव्याला पुष्टी मिळेल असेही बृजभूषण यांनी म्हटले आहे. दरम्यान, नरसिंग यादवने आपण उत्तेजक द्रव्यांचे सेवन केले नसून हे आपल्याविरुद्ध षडयंत्र असल्याचा दावा केला आहे.
आता, नरसिंगच्या या दाव्यांना राज्यातल्या विरोधीपक्षांच्या नेत्यांनी पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे. राज्य सरकारने नरसिंग यादवच्या पाठिशी उभं राहून त्याला रिओ ऑलिम्पिकमध्ये जाण्यासाठी मदत करावी अशी मागणी विधानसभेतले विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. तर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील नरसिंग यादवच्या पाठिशी उभे राहिले आहेत.
नवी दिल्ली: रोज नवे खुलासे झाकीर नाईकवर धर्मांतराच्या प्रकरणात होत असून आता एका नव्या खुलाशानुसार, धर्मांतरासाठी झाकीर नाईकच्या संस्थेकडून ५०,००० दिले जात असल्याचे समोर येत आहे.
देशातील धर्मांतराची मोहीम राबवणारे एक केंद्र म्हणून झाकीर नाईक संस्था इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन उदयाला येत होते. सध्या जवळपास ८०० नागरिकांचे झाकीर नाईकच्या संस्थेने धर्मांतर घडवून आणल्याचे चौकशीतून पुढे आले आहे. धर्मांतराची मोहीम झाकीर नाईकचा सहकारी आर्शी कुरेशी आणि रिझवान खान हे दोघे राबवत असल्याचा आरोप होत आहे.
याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनेकजण झाकीरच्या भाषणाने प्रभावित होऊन झाकीर नाईकची संस्था इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनशी संपर्क करत होते. त्यावेळी कुरेशी हा त्यांना मुंबईत बोलावत असे, तर रिझवान त्यांना पनवेलला उतरवून त्यांची राहण्याची आणि धर्मांतराची सर्व प्रक्रिया पूर्ण करीत असे. याबद्ल्यात रिझवान झाकीर नाईकच्या संस्थेकडून पैसे घेत असल्याचे समोर येत आहे.
झाकीर नाईकच्या संस्थेला या कामासाठी सौदी अरेबियाकडून रसद मिळत असल्याची माहितीही समोर येत आहे. त्यामुळे हे धर्मांतर केलेल्या नागरिकांचे पुढे काय होत होते, याचा तपास सध्या पोलीस करीत आहेत.
नवी मुंबई : महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांनी अनधिकृत बांधकाम प्रकरणी दिघ्यातील राष्ट्रवादीच्या तीन नगरसेवकाचे निलंबन करण्याची कारवाई केली आहे. दीपा गवते, अपर्णा गवते आणि नविन गवते या तिघा नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याचे समोर येत आहेत. अपर्ण गवते आणि नवीन गवते हे दाम्पत्य आहे. आता प्रकरणी इतर पक्षातील नगरसेवकांवर आयुक्त मुंडे कारवाई करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. या निलंबनाच्या कारवाईमुळे आधीच अल्पमतात असलेल्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. सद्या काँग्रेसच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीचा महापौर आहे. उपमहापौर काँग्रेसचा आहे.
नवी दिल्ली – मंगळवारी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्याकडे घरापासून संसदेपर्यंतच्या प्रवासाचा व्हिडिओ सोशल मीडिया साईट्सवर टाकून अडचणीत आलेले आम आदमी पक्षाचे खासदार भगवंत मान यांनी लेखी माफीनामा सादर केला. माझ्याकडून अनवधानाने चूक झाल्याचे भगवंत मान यांनी माफीपत्रामध्ये म्हटले आहे. मला केवळ शैक्षणिक व्हिडिओ तयार करायचा होता, असेही त्यांनी स्पष्ट केले. आपल्या माफीचेही राजकारण केले जात असल्याचा आरोप भगवंत मान यांनी केला आहे.
गेल्या आठवड्यात संसदेच्या दोन्ही सभागृहात भगवंत मान यांच्या या व्हिडिओचे गंभीर पडसाद उमटले होते. लोकसभा अध्यक्षांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमली असून, त्या समितीचा अहवाल आल्यानंतर मान यांच्यावर काय कारवाई करायची, याचा निर्णय घेण्यात येणार आहे. मान यांना तूर्त संसदेमध्ये न येण्याची सूचना सुमित्रा महाजन यांनी केली आहे.
भगवंत मान यांना सभागृहातून निलंबित करण्याची मागणी जवळपास सर्वपक्षांकडून करण्यात आली. सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही भगवंत मान यांच्या कृतीचा निषेध केला होता. त्यामुळे लगेचच सोमवारी सुमित्रा महाजन यांनी नऊ सदस्यीय समिती नेमण्याचा निर्णय घेतला. भाजप खासदार किरीट सोमय्या हे या समितीचे अध्यक्ष आहेत. दिल्लीचे पोलीस आयुक्तही या समितीमध्ये आहेत. या समितीची बैठक मंगळवारी संसद भवनामध्ये पार पडली. तीन ऑगस्टपर्यंत या समितीला आपला अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
Subscribe to:
Comments (Atom)








